साडेसाती ही संकल्पना आता आपल्यापैकी अनेकांना परिचयाची आहेच
(ज्यांना परिचयाची नाही, त्यांनी माझा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करावे); पण ‘अडीचकी’ म्हणजे एक्झॅक्टली काय, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शनिमहाराज प्रत्येक राशीत साधारणपणे त्यांच्या मंद गतीनुसार अडीच वर्षे भ्रमण करून मग पुढील राशीत प्रवेश करत असतात. त्यांचे हे राशीभ्रमण जेव्हा तुमच्या अगोदरच्या+तुमच्या+तुमच्या नंतरच्या अशा तीन राशीत मिळून (२.५X३=७.५) वर्षे होते, तो काळ साडेसातीचा असतो.
... अशाच प्रकारे जेव्हा शनिमहाराज तुमच्या राशीपासून चौथ्या व आठव्या राशीत प्रवेशतात तेव्हा पुढची अडीच वर्षे ही ‘अडीचकी’ किंवा पनवतीची असतात असे मानले जाते. म्हणून साडेसाती संपल्यावर अडीच वर्षांनंतर पुन्हा चौथा शनी येतो तेव्हा पनवती/अडीचकी येते... तसेच साडेसाती संपल्यावर साधारणत: साडेबारा वर्षांनंतर शनी आठवा होतो, तेव्हाही अडीचकी/पनवती येते... म्हणजे आत्ता शनिमहाराज मकर राशीत प्रवेश करत असल्याने ते मिथुनेकडून आठव्या आणि तुळेकडून चौथ्या राशीत आल्याने दोन्ही राशींना अडीचकी लागली आहे.
पत्रिकेतील चौथे व आठवे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. चौथे स्थान हे कौटुंबिक सौख्य, मन:शांती, वास्तू-घर, वाहनसौख्याचे असते, तर आठवे स्थान हे मृत्युस्थान म्हणजे काहीसे पीडाकारक, अनारोग्यकारक व नकारात्मक स्थान मानले जाते. या दोन्ही स्थानांतील शनिमहाराजांचे भ्रमण हे व्यक्तीला कधीकधी साडेसातीपेक्षाही त्रासदायक ठरू शकते. अडीचकीच्या संदर्भात चौथ्या शनीची दृष्टी ही अनुक्रमे रोगस्थान/व्यवसायस्थान (कर्मस्थान) आणि प्रथम स्थान (स्वत:चे समाजातील स्थान), व्यक्तिमत्त्व यावर पडते. अडीचकीच्या संदर्भात आठव्या शनीची दृष्टी ही व्यवसायस्थान (कर्मस्थान)/धनस्थान व संततीस्थान यावर पडते हे लक्षात ठेवावे.
अडीचकीच्या काळात संबंधित राशीच्या व्यक्तींनी स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची अत्याधिक गरज आहे. अडीचकीच्या कालावधीत आई-वडिलांचे आरोग्य जपावे, वाहने जपून चालवावीत, दूषित वास्तू खरेदी करू नये, शक्यतो या कालावधीत अगदीच गरज नसल्याशिवाय राहत्या वास्तूचे मॉडिफिकेशनदेखील (तोडफोड) करू नये, असे म्हणतात. आर्थिक व्यवहार अत्यंत सुरक्षितपणे करावेत. जामीन राहू नये. स्वत:हून कोर्टकचेरी/पोलिस स्टेशनची पायरी न चढणे श्रेयस्कर आहे. स्वत:चे समाजातील स्थान व प्रतिष्ठा यांना बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. अडीचकीच्या काळात नैतिकतेला अधिक महत्त्व असल्याने, तुमची लहानशी चूक/अनैतिक वागणूकदेखील महागात पडू शकते हे लक्षात ठेवावे ही नम्र विनंती...
- सचिन मधुकर परांजपे (पालघर)